यक्षगान-शोधाचा प्रवास

कर्नाटकात उडुपीतल्या यक्षगान केंद्राला भेट देताना एखाद्या वाटेवरुन प्रवास करुन आल्यावर त्याच वाटेचा परत प्रवास करणं म्हणजे काय असतं याचा मी अनुभव घेत होतो. यक्षगान केंद्राची वाट माहितीची होती, मी जाऊन येऊन होतो. पण, यावेळी मी माझ्या विद्यार्थ्यांबरोबर नव्याने प्रवास अनुभवत होतो. गेलेला काळ मला परत पुकारत होता. त्या काळाचे अर्धे-मुर्धे बंद-उघडे दरवाजे मी परत उघडत होतो. भूतकाळ आणि वर्तमानकाळ फ़ुटाणे-साखर एकत्र बांधलेल्या चिकट पुरचूंडीसारखाच असतो.

कर्नाटकात उडुपीच्या यक्षगान केंद्राच्या इमारतीचा लोखंडी दरवाजा ढकलून मी आत शिरलो. आता इमारत मोठी झालीय. तिथे एक साधी, छोटी इमारत असायची. आत शिरल्यावर समोर आड. वर्षभर पाणी. डाव्या बाजुला गेस्ट हाऊस आणि केंद्रातले प्रमूख शिक्षक, गुरु संजीव सुवर्णा यांचे घर. उजव्या बाजुला रिहर्सल करण्याची जागा असायची. आजही यक्षगान केंद्रातल्या मुलांचा सकाळी लौकर उठून सराव सुरु होतो. नाचाची प्रॅक्टिस. गाण्याचा रियाज. टाळ. मद्दले दिवसभर बोलत राहातात. वीसेक वर्षापूर्वी स्पिक मॅके या संस्थेने मला गुरूकुल स्कॉलरशिप दिली होती. उडुपी मंगलोर रस्त्यावर शाळिग्राम या गावात राहाणा-या गुरु कोटा शिवराम कारंत या आधुनिक भारतातल्या थोर माणसाच्या यांच्या सहवासात राहुन त्यांच्या दैनदिंन आयुष्याचा अभ्यास करायचा होता. शिवराम कारंत या अवलियाचे नांव आज सगळ्यांना माहिती नसले तरी साहित्य आणि संस्कृतीचे भान असणारे त्यांना विसरु शकणार नाहीत. कादंबरी, नाटक, कविता, लहान मुलांसाठीचा विश्वकोष, बाल शिक्षणातील प्रयोग, यक्षगान परंपरेतील आधुनिकतेची पायाभरणी अशा विविध क्षेत्रांत लीलया संचार करणारे कारंत आधुनिक भारतातील एक प्रचंड व्यक्तिमत्व. मी शाळिग्राम पहिल्यांदा पोहचलो तेंव्हा गावांतली स्वच्छता चांगली राहावी यासाठी हा वयाची ऐंशी पार केलेला तरुण उपोषणाला बसला होता. आधुनिक कन्नड कथेचे शिल्पकार शांतिनाथ देसाई (त्यावेळी देसाई कुवेम्पू विद्यापीठाचे कुलगुरु म्हणुन रिटायर झाल्यावर कोल्हापूरात स्थायिक झाले होते) कारतांचा उल्लेख ‘मॉडर्न ऋषी’ म्हणून करत असत. मी उडुपीला असताना शांतिनाथ देसाईंनी मला लिहिलेली पत्रे माझ्याजवळचा बहुमोल ऐवज आहे.

कारंतांबरोबरच राहाण्याबरोबर उडुपीतल्या यक्षगान केंद्रात राहुन यक्षगानाचेही शिक्षण घ्यायचे होते. यक्षगान लोकनाट्यपरंपरेतील संगीत, वेशभूषा, रंगभूषा यांचाही अभ्यास करायचा होता. त्यासाठी, उडुपीतच रिजिनल रिसोर्स सेंटर (आर आर सी) आहे. यक्षगान कला केंद्राप्रमाणे आर आर सी चे व्यवस्थापन महात्मा गांधी मेमोरियल कॉलेज (एम जी एम) पहाते. काही शैक्षणिक संस्थामधे मुले जातात, शिक्षक शिकवितात. मुलांना पदव्या मिळतात तर शिक्षकांना पगार. उडुपीच्या महात्मा गांधी मेमोरियल कॉलेज (एम जी एम)मधे फ़क्त पदव्यांपुरते शिक्षण मिळत नाही. ज्ञान देणे आणि त्याचा प्रसार करणे या ठराविक चौकटीच्या पलिकडे जाऊन समाज, संस्कृती आणि परंपरा यांच्याशी जोडून घेण्याच प्रयत्न एम जी एम कॉलेज या केंद्रांद्वारे १९४९ पासून करत आले आहे. लोककलांचे संवर्धन करण्याबरोबर त्यांना कलात्म अंगाने पुढे नेणा-या ज्या मोजक्या संस्था आहेत त्यातल्या या दोन संस्था.
...
 
यक्षगान केंद्रांवर जाण्याची माझी यावेळची भेट विशेष होती. पुलाखालुन बरेच पाणी वाहुन गेल्याचा मी साक्षीदार होतो. यक्षगान, लोककलांचा अभ्यास, शिवराम कारंतांचे निधन, शिक्षण. विद्यार्थी दशेच्या औपचारिकतेतुन बाहेर पडून वेगवेगळ्या नोक-या करुन मी शिक्षकी पेशात रुळलो होतो. स्वतःचे नाटके सादर होत होती. बंगलोरमधल्या माझ्या नोकरीच्या निमित्ताने भारतभरातले नाटक, ठिकठिकाणचे नाटकवाले यांच्याशी संबध वृध्दिंगत होत होते. आमच्या युनिवर्सिटीच्या डिस्कव्हर इंडिया प्रोग्रॅम मधे यक्षगान परंपरेवर संशोधन करणा-या मुलांचा मेंटर म्हणून आता उडुपीला आलो होतो. तिथली माणसे तीच. मीही तोच. पण आमच्या भूमिका वेगळ्या झाल्या होत्या. मी माझ्या मुलांचा शिक्षक म्हणून गुरु संजीव सुवर्णांना आमच्या मुलांना यक्षगान समजुन घ्यायला मदत करा म्हणुन साकडे घातले होते. ते मोठ्या मनाचे. मला तोडक्या-मोडक्या, कन्नडी हेल मधे, “तुम हो उनकों बतानें के लिये. मै काए कों” म्हणून गेले. सवयीप्रमाणे त्यांच्या पायावर मी हात ठेवला. गुरु संजीव सुवर्णा तशाच लुंगीत. तोच झब्बा. सायकल जाऊन स्कुटर आली. डोक्यावरचे केस पांढरे झाले होते. शिवराम कारंतांची आठवण करुन देईल असे त्यांचे केस मानेवर रुळले होते. यक्षगान केंद्राचेही रुप पालटुन गेलेले. शिकायला येणा-यांची संख्या वाढली. यक्षगानाकडे पहाण्याचा समाजाचा दृष्टिकोन बराच बदलला. यक्षगानात काम करणारे प्रमुख नट बाहेर जाऊन रग्गड पैसा मिळवू लागले. सिनेमात कामे मिळावायला यक्षगान शिडी झाली आहे. एके काळी आयुष्यभर केंद्रात राहून साधना करणा-या मुलांपेक्षा बघे वाढले आणि वर्ष-सहा महिन्यांच्या ‘ट्रेनिंग’ वर यक्षगान संपुष्टात येऊ लागले आहे. अत्यंत गरीब कुटूंबात, काबाडकष्ट करत यक्षगान केंद्रात शिकून तिथेच शिकविणा-या गुरु संजीव सुवर्णांसारख्या इतर शिक्षकांच्या नजरेतुन हा बदल जाणवत होता. ते मला सांगत होते. नेहमीप्रमाणे त्यांचे कन्नड भाषेतील बोलणे हिंदी-इंग्रजीतून स्पष्ट करायला त्यांच्या पत्नी वेदवती होत्या. त्या कौतुकाने माझ्याशी बोलत होत्या, “तुम आये थे तब मेरा बेटा इतनासा था. पर तुम वैसे का वैसा हो. अब तुम बडा प्रोफ़ेसर और राय़टर बन गया है.” माझ्या बरोबरच्या विद्यार्थ्यांना बरच काही कळत होतं. बरंच काही डोक्यावरुन जात होतं. बरेच जण यक्षगानात वापरल्या जाणा-या जिरेटोपांच्या वेगवेगळ्या आकारांनी आणि वजनांनी तोंडात बोटे घालत होती. हातात घेतल्यावर एवढा जड टोप तर डोक्यावर घालून नाचताना काय होत असेल हे बघत होते. काही जण, यक्षगान कलाकारांच्या कपड्यांवरचा ‘एथनिक’ कलर बघून हुरळुन जात होते. कॅमेरा बाळगाणारी मुले कपड्यांचे रंग, कलाकारांचे भाव, मुद्रा टिपत होते. मधे मधे, कुणीतरी मोबाइलच्या वापरांमुळे मला इरिटेट करत होता. आधी बघावे, मनात साठवावे आणि मग फ़ोटो काढावा असा निर्णय आम्ही आधीच घेतला होता. तरी, काहीजणांचे हात सुलभ हातात येणा-या मोबाईलकडे आणि सेल्फ़ि-करणाकडे जात होता. पारंपरिक पद्धतीने यक्षगान कलाकाराला डोक्यावरचे कॉस्च्य़ूम्स तासनतास बसुन बांधावे लागतात. पण, आता यक्षगानातील आभुषणांसाठीच्या मटेरियलमधे बदल झाला आहे. हलक्या वजनाचे मटेरियल उपलब्ध आहे. अर्थात, ब-याच सिनियर कलाकारांना पारंपरिक मटेरियल शिवाय यक्षगान खेळता येत नाही ही ही एक गम्मत!

आर आर सीचे प्रमुख कृष्णभट्ट आम्ही येणार म्हणून आधीपासुन हरकले होते. काही न सांगता ते चक्क रेल्वे स्टेशनवरच रेल्वे पोहचायच्या वेळेला हजर. नेहमप्रमाणे खादीच्या कपड्यातला त्यांचा साधा वेश. पायात तशीच चप्पल. जगभर प्रवास करु कर्नाटकातील लोककलांचा विशेषतः यक्षगान परंपरेचा झेंडा दिमाखात मिरवणारे कृष्णभट आजोबा झाले असले तरी तसेच तरुण उमदे दिसत होते. एखादे संशोधन केंद्र चालवणे किती जिक्रीचे असते हे कृष्णभटांपेक्षा कोण अधिक चांगले समजू शकेल! संशोधन केंद्रासाठी कलाक्षेत्रात जाऊन साधन सामग्री मिळविणे, त्याची नीट वर्गवारी करुन ती काळजीपुर्वक जतन करुन ठेवणे. अत्यंत नाजुक अवस्थेत असणा-या ध्ननीमुद्रिका, चित्र फ़िती वा कागदपत्रे यांची काळजी घेण्यासाठी हवे असणा-या तंत्रज्ञानाचा खर्च तर आवाक्याबाहेरचा. शिवाय, संशोधन केंद्रात काम करणारे आधिकारी, तंत्रज्ञ असणे ही वेगळीच आणि महत्वाची गरज. भटांचा भर आहे की ते लोकांपर्यंत आणि संशोधकांपर्यंत केंद्र पोहचले पाहिजे. केंद्रातील उपलब्ध माहितीचा साठ जनसामान्यांपर्यंत पोहचला पाहिजे. हे समाजाकडून आले आहे ते समाजापर्यंत पोहचले पाहिजे.

आमच्या विद्यापीठातील मुले भारतभरातील्या वेगवेगळ्या शहरांतुन आलेली. इंग्रजी भाषेतील शिक्षणाचा प्रभाव. वेगवेगळ्य़ा भाषा बोलणारी. त्यांच्याबरोबर यक्षगान पाहाणे, कलाकारांना भेटणे आणि ज्यांनी आयुष्याच्या एका टप्प्यावर माझ्यावर प्रभाव टाकला त्यांना आपल्या विद्यार्थ्यांसोबत भेटणे हा एक स्पेशल अनुभव होता. ऐन विशीतील मुले आपल्या परंपरा आणि संस्कृतीविषयीचे जे भान देतात ते नक्कीच वेगळे असते. सेल्फ़िसाठी धडपडत असले तरी उडुपीला जाऊन आल्यावर त्यांनी सादर केलेला अभ्यास प्रकल्प, तयार केलेल्या छोट्या फ़िल्म्स, एकत्र बांधलेले फ़ोटोग्राफ़्स, यक्षगानाच्या फ़ॉर्ममधे त्यांनी सादर केलेले नाटक नव्या पिढीच्या सजगपणाची साक्ष देतात. असंही लक्षात येतं की परंपरा बदलत राहातात तशा त्या अधिकाधिक सचेतन होत जातात. काळाचा विशाल पट त्या गुंफ़त असतात. शिवराम कारंतांपासुन संजीव सुवर्णा ते महाबल हेगडे ते शिवराम हेगडेंपर्यंत असे कलाकार आपल्या भाषेच्या, सामाजिकतेच्या चौकटी लांघुन पिढ्य़ान पिढ्या संवाद करत राहातात. सगळ्यात कॉमन असते ते परंपरा आणि संस्कृतीचे नवनवे आकलन, अभिनय आणि स्वरांचे गारुड, कलेची साधना आणि न संपणारा यक्षगान- शोधाचा प्रवास.

पूर्वप्रसिध्दी: रसिक ॥ दिव्य मराठी ॥ २४ जानेवारी २०१६

Comments